‼️ भारतातील सर्वात उंच इमारत ‼️

‼️ भारतातील सर्वात उंच इमारत ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 13/05/2025 :
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वांत उंच इमारत आहे. परंतु भारतातील सर्वांत उंच इमारत कोणती? विशेष म्हणजे ही सर्वात उंच इमारत महाराष्ट्रात मुंबई मधील वरळी येथे आहे. या इमारतीचे बांधकाम २००७ मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाची पायाभरणी करणारी व्यक्ती विकास कासलीवाल हे होते. ते एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. यापूर्वी ते श्रीराम अर्बन इन्फ्राचे प्रवर्तक देखील होते.
या सर्वात उंच इमारतीचे नाव “पॅलेस रॉयल” असून ती ३२० मीटर उंच असून सर्वांत उंच इमारत म्हणून तिची नोंद आहे. या इमारतीच्या बांधकामात आर्थिक घोटाळा झाल्याचे बोलले जाते. परंतु आता ती पूर्ण झाली असून, तीच भारतातील सर्वांत उंच इमारत ठरली आहे. काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये इमारतीचा वरचा मजला पूर्ण झाला. त्याच वर्षी इमारती विरुद्ध अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या.
नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. त्यानंतर बांधकाम थांबवण्यात आले. प्रकरण लांबत गेले आणि प्रकल्पाचा खर्च दररोज वाढत गेला. एक वेळ अशी आली की, या प्रकल्पाचे प्रवर्तक श्रीराम अर्बन इन्फ्रा स्वतःच दिवाळखोरीत निघाले. कंपनीने इंडिया बुल्सकडून कर्ज घेतले. म्हणून इंडिया बुल्सने प्रकल्पाचा लिलाव केला. ऑनेस्ट शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड नवीन प्रवर्तक बनले. ही इमारत बांधण्यासाठी अंदाजे ३००० कोटी रुपये खर्च आला. या इमारतीत एकूण ७२ मजले आहेत. ही एक प्रीमियम निवासी इमारत आहे. २०१३ मध्ये या इमारतीतील एका फ्लॅटची किंमत २७ कोटी रुपये होती. आज येथील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत ४० कोटी रुपये आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
सौजन्य : अहिल्यानगर Live 24