जगाचा पोशिंदा कष्टकरी दिलदार शेतकरी
जगाचा पोशिंदा कष्टकरी दिलदार शेतकरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/9/ 2024 : दुकानासमोरच आठवडी बाजार भरतो. काल 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील एक शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला घेवडा घेऊन बाजारात विकायला आलेला.
घेवड्याचं पोतं खांद्यावर घेऊन तो दुकानात आला. मला म्हटलं एवढं तुमच्या काट्यावर वजन करून द्या. ते 20 किलो भरलं. मग त्याने तो घेवडा एका पसरलेल्या पोत्यावर ओतला.आज बाजारात गिर्हाईक कमीच होतं. त्याने 10 रु पाव किलो दर काढला. थोड्या वेळाने तिथे बाजारात इतर भाजीपाला विकणारे तिघेजण आले. त्यांनी शेतकऱ्याकडे प्रत्येकी 5 किलो घेवडा मागितला. याने 35 रु किलो दर सांगितला. त्यांनी 30 रू किलोनी त्याच्याकडून घेवडा घेतला. तोही मी आमच्याच काट्यावर वजन करून दिला. प्रत्येकाला 5 किलो. त्यात प्रत्येकाने पाव किलो जादा मागून घेतला. शेतकऱ्यानेही कोणतीही कुरबुर न करता दिला. त्यांनी तो माल विकून झाल्यावर त्याचे पैसे आणून दिले. या व्यापाऱ्यानी एक रुपयाही पदरचा न गुंतवता पैसा मिळवला. त्या शेतकऱ्याने मात्र जमिनीची नांगरट करून त्यात बिया, खते, औषधं, इतर मजुरांचा खर्च, तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च परत बाजारात बसून विकण्यासाठी घालवलेला वेळ अशी कितीतरी गुंतवणूक केलेली. पण इतके गुंतवून त्याला मिळाले किती? हा खरंच संशोधनाचा विषय आहे.
शेतकऱ्याचा मालही तासा-दोन तासात संपला. त्यानंतर तो माझ्याकडे दुकानात आला अन माझ्याकडे 10 रु दिले. मी विचारलं हे कशाचे? तर म्हणाला मघाशी ती वजनं केली नाहीत का, त्याचे हे पैसे?…. हे ऐकून मी स्तब्धच झालो. मी ते पैसे त्याला परत दिले. त्याच्याशी काय बोलावे हेच कळेना. तरीही त्याला म्हटलं
बिचाऱ्या इतकाही चांगला वागू नको रे या दुनियेत… नाहीतर आयुष्यभर दुसऱ्याची पोटं भरून तू मात्र मरेपर्यंत असाच उपाशी राहशील.
© -संतोष माणकापूरे
#शेतकरी #farming #farmers