ताज्या घडामोडी

माळशिरस तालुक्यातील सामाजिक राजकीय वातावरण बिघडवून इथल्या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न

माळशिरस तालुक्यातील सामाजिक राजकीय वातावरण बिघडवून इथल्या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्नद

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 04/02/2025 : 
हल्ली सोशल मीडियावर माळशिरस तालुक्यातील सामाजिक, राजकीय वातावरण बिघडवून इथल्या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मराठीत एक म्हण आहे “उचलली जिभ लावली टाळ्याला” वास्तव सोडून अवास्तव भुमिका घेणाऱ्यांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षातील माळशिरस तालुक्याची सामाजिक, भौगोलिक, औद्योगिक परिस्थिती लक्षात घेवून व सारासार अभ्यास दृष्टीने आपले विचार मतप्रदर्शन सल्लामसलत देऊन लक्षपूर्वक सदर विषयांवर सोशल मीडियावर प्रगट व्हायला हवे. पण हल्ली आपापल्या नेत्यांचे गुणगान, महती व उदोउदो करण्यात मग्न झालेले लंपट अनुयायी यांनी कंमरेचे सोडून डोक्याला गुंडाळायचे बाकी राहिले आहे.

वास्तविक पाहता अशा त्यांच्या अति उत्साही उतावळेपणा करणारे अनुयायी कार्यकर्ते यांना वेळीच आवरले पाहिजे अन्यथा त्यांचा अति उत्साह उन्माद व सल्लामसलत देण्याचा प्रकार म्हणजे संबंधित वरिष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते राहिले बाजूला त्यांचे चेले चपाटे यांच्या अंगात मात्र असा संचार येतो की ते फिर्यादी च्या भुमिकेत असतात तपास अधिकारी, फौजदार, न्यायाधीश यांचे आविर्भावात असतात प्रस्थापित नेतृत्व व नविन बाहेरून आलेले उदयोन्मुख नेतृत्व यांच्यात मतभिन्नता असू शकते, वैचारिक विरोधाभास असू शकतो. राजकारणात निवडणुका जाहीर झाल्या की दोन पार्टी एकमेकांविरुद्ध लोकशाही पद्धतीने निवडणूक लढू शकतात. ज्यांना जनाधार मिळतो ते लोकशाही मार्गाने निवडून येतात. निवडणूक संपली की राजकीय वैर कटुता संपते. पण यावेळी माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व माजी आमदार राम सातपुते विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचे राजकीय वैर तत्व थांबता थांबेना झाले आहे आणि त्यात भरीस भर म्हणजे त्या दोघांचे हित समर्थक अनुयायी कार्यकर्ते एकमेकांवर आरोप टिका व बदनामीचे आगीत तेल ओतून इथल्या परंपरेला सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैचारिक बौद्धिक सहकार अध्यात्मिक चौकट असलेली घडी विस्कटून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील हे चित्र परिस्थिती औद्योगिक, शैक्षणिक, कृषी बदल काही महिन्यांत किंवा पाच वर्षांत झालेला नाही हे नविन उदयोन्मुख नेतृत्व व त्यांच्या समर्थकांनी लक्षात घेतले पाहिजे. केवळ आक्रस्ताळेपणा, दमबाजी, पोकळ आत्मविश्वास व चढ्या आवाजात पोपटपंची केली म्हणजे आपल्या नेतृत्वाची उंची वाढत नसते. जे चांगले आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे ही सुसंस्कृत सुजाण नेत्यांची ओळख जनमानसात रुजली जाते. जत्रेत हवशे, गवशे, नवसे, छचोर अनेक असतात पण देवदर्शनाला येणारे यांच्या मनात हृदयात किती अध्यात्म भक्तीभाव ओथंबून आहे हे महत्त्वाचं आहे. माजी आमदार राम सातपुते व मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपापली पातळी सोडून कोणाची किती तळी उचलायची हे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या खोल कप्प्यात शिरुन ठरवले पाहिजे आणि त्यांच्या नेत्यांनी सुध्दा आपल्या अती उत्साही कार्यकर्त्यांना वेळीच आवरले नाही तर इथल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्या शिवाय रहाणार नाही अशी परिस्थिती असे वातावरण पहिल्यांदा ऐकायला पहायला मिळताना दिसत आहे. सोशल मीडिया मुळे कार्यकर्त्यांचा अश्व बेलगाम चौफेर उधळत आहे हे मात्र नक्की.

बी टी शिवशरण, ज्येष्ठ पत्रकार
श्रीपूर.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button