रानभाजी – रानकेळी
रानभाजी – रानकेळी
स्थानिक नाव : कवदर, कौदर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/09/2024 :
डोंगराळ तसेच दुर्गम भागामध्ये केळी पेक्षा कमी आकाराचीच पण, केळी सारखीच दिसणारी झाडे आपल्याला दिसतात त्यांना रानकेळी म्हणतात. आदिवासी भागातील लोक ’कवदर’ म्हणतात. या रानकेळी या जंगलामध्ये अडचणीच्या ठिकाणी उगवलेल्या असतात. तसेच खडकाच्या कपारीत, दरी मध्ये अशा ठिकाणी उगवतात. रानकेळी दिसायला खूप छोटी केळी आणी आत मध्ये खूप साऱ्या बिया असतात. त्यांची फळे ही केळी पेक्षा छोटी व पिवळ्या रंगाची असतात. यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. रानकेळी ह्या खाल्या जातात. त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच शरीरात प्रतिकार शक्ती मध्ये वाढ होते. या केळीला तिच्या पूर्ण आयुष्यात एकदाच फळ येते तीपण ३-४ वर्षा नंतर, आणी फळ आलीत आणी ती पिकली की तिचं आयुष्य संपून जातं. ही केळी खायला इतर केळी सारखी खूप गोड नाही लागत पण चवील छान लागते. या मध्ये असणाऱ्या बिया किडनी स्टोन साठी रामबाण उपाय म्हणून वापरल्या जातात आणी मुळीचा उपयोग ही केला जातो. जोपर्यंत पावसाळा असतो तोपर्यंत ही हिरवीगर असते आणी नंतर ती सुप्तावस्ते मध्ये जाते. पण जोपर्यंत या केळी पण उपलब्ध होतात तोपर्यंत जेवण करण्यासाठी या पानाचा उपयोग केल्या जातो. यातून निघालेल्या बिया शेतात कुठेपण टाकल्यात की पुढच्या वर्षी सगळीकडे परत नवीन रोपे तयार होतात.
सह्याद्रितील डोंगरांवर पावसाळ्यात रानकेळी तरारून वाढतात. रत्नागिरी जिल्ह्यात चवेणी तर कर्जत परिसरात कवदर या नांवांनी रानकेळी ओळखली जाते. रानकेळ बहुवार्षिक आहे. पावसाळ्यानंतर कोरड्या हंगामात ती सुकून जाते, पण मरत नाही. पावसाळा जवळ आला व हवा दमट झाली कि रानकेळीला कोंब येतो व पावसाळ्यात रानकेळी तरारून वाढते. ठराविक वर्षा नंतर रानकेळीला केळफुल येते. रानकेळीच्या केळफुलाला गोगडा असेही नाव आहे. केळफुलातून बारिक केळ्यांचे लोंगर वाढते. ही केळी खाण्यायोग्य नसतात. या केळ्यात मोठी बी असते. केळफुल व लोंगर आलेली रानकेळी मरून जाते. परंतु, केळ्यातील बी पासून नविन रानकेळी पुढच्या पावसात रुजतात. बागायती केळीला बुडाशी नविन फुटवे येतात. तसे फुटवे रानकेळीला येत नाहीत. रानकेळीच्या केळफुलाची भाजी खाण्यायोग्य व रुचकर असते. केळफुल आलेल्या रानकेळीच्या खोडाच्या बुंध्या जवळच्या भागातील गाभा (काले) कच्चा खाण्यायोग्य असतो. त्याची भाजीही करता येते. रानकेळीची पाने चांगली मोठी व रसरशीत असतात. ही पाने जेवणासाठी वापरतात. या केळीच्या पानावर वाफाळलेला भात वाढला तर त्यामुळे पान जरासे पोळते व भाताला त्या पानाचा सुरेख स्वाद येतो. पानगी तयार करण्यासाठीही रानकेळीचे पान फारच उपयुक्त आहे. तांदुळाचे पीठ दुधात कालवायचे. त्याची घट्ट पेस्ट रानकेळीच्या पानाच्या तुकड्यावर थापायची व त्यावर पानाचा दुसरा तुकडा दाबायचा. नंतर हे प्रकरण तव्यावर मंद आचेवर चांगले भाजायचे. भाकरी-पोळी तव्यावर उलट सुलट फिरवतात तशी पानगीही उलट सुलट फिरवायची. पाने किंचित करपू लागली कि पानगी तयार झाली. पानगीला रानकेळीच्या पानाचा मस्त स्वाद येतो. गरम पानगी सोबत, तुप व फोडणीची खारातील मिरची असेल तर उत्तम बेत.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण